मंगळवार, १६ जुलै, २०२४

 झोप आणि नीज 


दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच पण नीज मध्ये जो गोडवा आहे तो झोपेत नाही. नीज म्हटले की लगेच नीज नीज रे बाळा, नीज माझ्या, सारखी  अंगाई गीते  आणि पाठोपाठ आई  आठवते.  झोप म्हटले की झोप आता, बास झाले, झोपा काढा, झोपून रहा, झोपा  केला, वगैरे दटावणीचे सूर आठवतात! 

तर अशी ही झोप (नीज म्हणणारे कोणी नाही आता) किती महत्वाची आहे. आज आणि उद्या यातील अती महत्वाचा दुवा ! त्या झोपेत काय काय होते ! स्वप्ने पडतात, कोणी घोरते, कोणी चालते, कोणी बडबडते ही. दिवास्वप्न पाहणारे ही भरपूर असतात. हे सर्व दिवसभर केलेल्या धावपळीचे व विविध गोष्टी  ऐकण्याचे, वाचल्याचे, पाहण्याचे परिणाम असतात. झोपेतून कोणाला उठवू नये म्हणतात, ते या साठी ! 
प्रवासात, नीरस भाषणाच्या कार्यक्रमात, नको असलेल्या गप्पा चालू असतानाही झोप येते काहीना. लिंगभेद करावयाचा झाल्यास असे एक निरीक्षण आहे की (माझे) महिला खूपच सावध, दक्ष तसेच  संकोच बाळगून असल्याने  त्या अशा कार्यक्रमात वगैरे झोपत नाहीत. त्यांना आपण पाहिलेले, ऐकलेले दुसऱ्यांना नक्कीच केव्हा ना केव्हा सांगायचे असते ! त्यामुळे लक्ष देऊन असतात ! संसाराच्या दोरीवर कसरत करताना, ऑफिस मध्ये मात्र त्यांना पेंग येऊ शकते जी चहाच्या माऱ्याने घालवतात बिचाऱ्या. वार्धक्यात, ही झोप त्या महिला भरून काढतात असेही दिसते. चालक केव्हा केव्हा पेंग आलेली असतानाही वाहन चालवतात, त्यांचे मात्र नवल वाटते आणि त्यांच्या मागे बसून माझ्यासारख्या महिला त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांना जागे ठेवण्याचे प्रयत्न करतात, त्यांचेही कौतुक !
काहींची झोप हुकमी असते, काहीना अमुकच ठिकाणी लागते, काही कोठेही डोळे मिटतात !  सहज सोपी चिरनिद्रा पण काही भाग्यवंताना लाभते. 

अशी चुटकी किंवा पेंग ही आवश्यक असते,  नव्या दमाने उद्याला सामोरे जायला. अर्थात प्रत्येक व्यक्तीची झोपेची जरुरी कमी जास्त असू शकते. नवजात बालक दिवसभर झोपून रात्री ही झोपते हा काळ सर्वसाधारणपणे अठरा तास असतो. हळूहळू झोप कमी होऊन हालचाली वाढल्या की ते बारा तासांवर येऊन पोचते. तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तीना आठ तास झोप भरपूर होते. वार्धक्य आले की झोप हळूहळू कमी होऊन सात ते सहा तासांवर येऊन पोचते. पाच तास ही पुरते.  विद्वान लोक खूप कमी झोपतात कारण सतत ते कार्यरत असतात. त्यांच्या तन, मनाला मग कमी झोपेची सवय होते. म्हणजे आठ तास झोपणारे लोक कमी बुद्धीचे असतात असे मुळीच नाही. परंतु ते आपली कार्यक्षमता पूर्णपणे वापरत नाहीत, असे वाटते. 
सध्याची तरुण पिढी पाहिल्यास तरुण  मुले खूपच कमी झोपतात असे लक्षात येते. अर्थात हे सर्व सोशल मीडिया मुळे तसेच आंतरराष्ट्रीय काम किंवा व्यवहारामुळे. 
पुरेशी झोप घेणे हे आरोग्य दृष्ट्या अती महत्वाचे वाटते. मानसिक सल्लागार ही हेच सांगतात. अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर नक्कीच होतात आणि ते टाळणे नक्कीच जरुरी आहे. विद्यार्थी दशेत तर पुरेशी झोप आवश्यकच आहे अर्थात घरी, शाळेत वर्ग चालू असताना नव्हे !  झोप ह्या विषयावर खूप संशोधन झाले आहे. अती झोप जशी वाईट तसा निद्रानाश ही वाईट. 

मी ह्या विषयावर लिहिण्याचे कारण मला कुठेही केव्हाही झोप येत नाही,  तरीही झोप मला अतिशय प्रिय आहे. मला बोलता बोलता झोपणाऱ्या व्यक्तींचे कौतुक आहे आणि मी त्यांना निवांत झोपू देते! दिवसाकाठी शांत मनाने, समाधानाने झोपण्यात जी मजा आहे ती अजून कशात नाही. गृहस्थाश्रमी  असताना सुट्टीच्या दिवशी दुपारी  दहा मिनिटांची झोप ही पुन्हा ताजेतवाने करायची. आता निवृत्ती नंतर वेळ असला तरी माझी झोप हुकमी नाही. तिच्या वेळेलाच ती येते . तिला चुकून कधी जास्त वेळ पकडून ठेवले तर डोके जड होते ! 
मतितार्थ, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी आणि ती ओळखून प्रत्येक व्यक्तीने आपापली झोपेची वेळ ठरवावी. वेळेत नियमितता ठेवणे नक्कीच प्रकृतीला हितकारक. एकदा वेळ ठरली की उठण्यासाठी गजर ही लावण्याची गरज नसते. हा झोपे वरील प्रबंध नाहीये, झोपेला आळवण्याचे प्रयत्न ! 
अलका काटदरे/२६.११.२०२३


 पुणे आणि मुंबई 


पुण्यात एवढे काय आहे की जो जातो तो पुण्य नगरीच्या प्रेमात पडतो.

मला वाटते सुंदर मिलाप आहे जुन्या आणि नवीन विचारांचा. मिश्रण आहे एकत्र झालेले दोन पिढ्यांचे. जागा मुबलक, माती ओढाळ, माणसे अजूनच लाघवी. अरे तुरे करतील तसे अगत्याने  गत संस्कृती चा पाढाही वाचतील. शिकवण्याची ह्यांना खूप खुमखुमी. तेथे गेल्याने अगाध ज्ञानाचा सागर समोर पसरतो. काय काय शिकावे ह्यांच्याकडून? 
स्पष्टवक्ते पणा जो मुंबईकरांना कधी जमला नाही 
स्वाभिमान, जो बाळगण्याची भीती नेहमीच राहिली मुंबई  च्या चाकरमनीला.
चिकाटी, जी मुंबईकराला चिकटलीच आहे आपोआप,  पण नको त्याची ! 
वारसा प्रेम , जे मुंबईकर सांगू शकत नाहीत कारण येथे त्यांना त्यांचीच  ओळख नसते.
संस्कृती दर्शन,  जे पूर्वापार पेशवे काळापासून जिवंत आहे आणि जे मुंबईकरांना दाखवता येणे महा कठीण काम, कुणाकुणा ची आणि कोणती संस्कृती दाखवायची ! 

पुण्यातील अजूनपर्यंत चे आकर्षण म्हणजे मोठाली घरे आणि प्राचीन राजवाडे. ते तर इतिहासापासून पाहिले होतेच पण एकेका कुटुंबाचे ही मस्त जुने वाडे पाहिले की मुंबईकराना स्वप्नात असल्यासारखे वाटते.  जागोजागी छोटी छोटी मंदिरे, देवांना न जुमानता त्यांना ठेवलेली  नावे आणि देवपूजा झाल्यावर पोटपूजेची व्यवस्था म्हणून कोपऱ्या  कोपऱ्यावर टपरी चहा आणि खाद्यगृहे. म्हणजे घरी दारी खाणार तुपाशीच पण उपाशी ही नाही राहणार ! 
धन्य ते पुणेकर आणि त्यांची अजब  जीवनशैली. 
तेथील संगीताचा वारसा, बुद्धिवादी आणि जीवनाशी कोणतीही तडजोड न स्वीकारणारे लोक, खळखळ वाहणारी  नदी, भव्य रस्ते आणि त्यातून आपल्याला हवे तसे बाजी मारून पुढे सरसावणारे पुणेकर ! संध्याकाळी बाजी मारून दिवसाशी दोन हात करून पुन्हा सातच्या आत घरी परतणारे पुणेकर. 
हे सर्व मनुष्य निर्मित आणि निसर्ग संपदा, विचारूच नका. डोंगर कड्यानी भरलेला, trekkers गड्यांचा हक्काचा प्रदेश. थंडीत गुलाबी थंडी आणि उन्हाळ्यात बिन घामाचा पण शरीर कडक करणारा उकाडा. अशी दोन टोके, पुणेकरांसारखीच !  

नाहीतर मुंबई ! 

घेतेय सर्वांना सामावून, मिरवत राहिलीय झेंडा आपल्या उदार अंत:करणाचा. आपल्या वितभर  खळगीची भ्रांत करता करता जमेल तेवढे समाज कार्य करीत. पूर येऊ देत, स्फोट होऊ देत, धमक्या काय आणि अपघात किती, तिला काही फरक पडत नाही ! 
समुद्राचा गाज ऐकत  अखंड वाहणारी जीवन सरिता ! 
येथे आलेल्या प्रत्येकाला आपलेसे करणारी पण तेवढेच प्रत्येकाच्या मनात त्याच्या गावा कडील ओढ कायम ठेवणारी. खरी तर दयनीय अवस्था आहे तिची,  पण वाली कोण ? जो तो आपली तुमडी भरण्यात गर्क आणि येथील राजकारण ! विचारूच नका. मोर्चे, बंद, सभा, घोषणा काय काय ऐकावे तिने. तरीही बिचारी सर्व सण साजरे करते, इमाने इतबारे, साग्र संगीत !  हिच्या जीवावर पूरा देश नाचतो तरीही हिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. का तर ही कुणा एकाची माती नाही ! 
मुंबईने लवकरच पुण्यनगरी पासून काही धडे घ्यावेत असे मात्र वाटते ! 
         ✍️अलका काटदरे/ ९.८.२३

मैत्री 


 मैत्री - एक लहानसा शब्द, पण खूप मोलाचा.


आयुष्यात सारे काही आहे आणि तुमची कुणाशी मैत्रीच नाही मग तुम्ही अगदीच भणंग. वाचायला खूप जड जातय ना? खरेच मैत्रीचे मोलच तेवढे आहे. 

माझ्यापासून पाहायचे झाल्यास मला खूप मैत्रिणी आहेत,
प्रकारही खूप त्यांचे. शाळेतील, कार्यालयीन, प्रवासातील,
कॊलेजमधील, नातेवाईक. हॊ, नातेवाईक मधून पण
एक मैत्री होऊ शकते- नि:पक्ष, नि:स्वार्थी! 

या सर्वांमधून खोलवर पाहता, मला सर्वात जवळची
वाटते ती माझी पुस्तकांशी मैत्री. स्तंभित व्हाल आपण
हे वाचून. शाळेत कायम मैत्रिणींच्या गराड्यात राहूनही
कसे माहीत नाही, पण ह्या पुस्तकानी मात्र मन प्रचंड
आकर्षित करून घेतले. आमच्या घराजवळच एक सुंदर
वाचनालय होते. पुस्तके नाना तऱ्हेची , भरगच्च. वेळ 
भरपूर. असे सर्व असता, सहवासाने प्रेम न वाढले तरच
नवल! घरूनही पूर्ण पाठींबा! मग काय! अगदी दिलखुलास
गप्पा मारुन घेतल्या, शाळेच्या दिवसात. कधी 
विसंशी, कधी सुमतीजींशी तर कधी राजाकाकांशी. लहान
वयात त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. काही विचार
पक्के झाले, काही संकल्पना तयार झाल्या. स्वप्ने तर
विचारू नका, किती रंगवली- सर्व ह्या पुस्तकांच्या मदतीने!
आणि मग हा छंदच लागला, वाचायचा. पुस्तकांच्या शोधात
नंतर निघतच राहिले, वेगवेगळ्या ठिकाणी ! वेगवेगळ्या
भाषेत!

हळूहळु मैत्री विस्तारत गेली. विषयही बदलत गेले. कधी
प्रेमाचे, कधी अध्यात्मिक तर कधी मौलिक- सर्वच बाबतीत!
वेगवेगळ्या पुस्तकातून शब्दांचे बारकावे लक्षात आले.
त्यातून परिक्षण ही करता आले- चांगल्या वाईटाचे.

वेळेचे बंधन नाही, अवाजवी खर्च नाही. आपल्या आवडी
जपून आपल्यावर कॊणतेही बंधन न घालणारा हा छंद.
नव्या पुस्तकाची चाहूल लागताच माझी होणारी तारांबळ,
आता केव्हा हे वाचायचे आणि ती हुरहूर!  हा सर्व आनंद
घेत असता हे ही लक्षात  आले�

मनीचा चंद्र ते ISRO चा चांद 


 खरेच, खूप छान विषय. अगदी पाळण्यात असल्यापासून ज्या चांदोबाला भेटतोय, ऐकतोय, वाचतोय, त्या चंद्रमाला आता अनुभवायची वेळ येणे हे केवढे परम भाग्य या पिढीला आणि एवढी वर्षे जो कल्पना विलास वाटला तो वास्तवात कसा आहे हे कुतूहल जागे करून, होऊन, प्रत्यक्ष त्याची पाहणी करायची वेळ आलीय ही सुवर्णसंधी. 

 चांदोमामा च्या स्वरूपात भेटणारा चंद्र, आईच्या अंगाईतून जाणवणारा प्रेमळ मामा, मग लपाछपी खेळणारा, लिंबोणीच्या झाडामागे लपणारा चांदोबा, चांदण्या बरोबर चमकणारा, प्रेमी युगुलाना खुणावणारा चांद, लालिमा पसरवणारा चंद्र, मधू इथे आणि चंद्र तेथे म्हणायला लावणारा आणि मधुचंद्राची लज्जत वाढवणारा चंद्र, भाऊबीजेच्या दिवशी भगिनींना प्रेमाने ओवाळणी करण्यासाठी परातीत दर्शन देणारा चंद्र, कडव्या चौथला तमाम उत्तरवासिय सौभाग्यवतीना दर्शन देऊन नवऱ्यावरील प्रेम वाढवणारा चंद्र ! किती त्याची रूपे आणि किती त्याच्या भूमिका ! सर्व आपल्या मनीचे, कल्पनेतले ! कोणी हे सर्व कल्पिले ? कवी वृत्तीच्या मानवाने. प्रेमाने आसुसलेल्या, थकल्या भागल्या जीवाला रात्री प्रसन्न शांतता द्यायच्या एकाच ध्येयाने जसे प्रेरित होऊन हा चंद्र तेथे भव्य निळ्या, गडद आकाशात उभा ठाकलेला असतो, स्तब्ध, एकटाच ! संपूर्ण जगाला, सर्व धर्मियांना प्रेमळ वेड लावणारा चंद्र ! जेवढा तो भाऊराया तेवढाच देवासमान. कलेकलेने वाढणारा, जगाला प्रगतीची आशा दाखवणारा चंद्र. 
ह्या मनीच्या चंद्राने जसे आबालवृद्धांना वेड लावले तसेच किंबहुना जास्त वेड संशोधकांना लागले, ह्या ग्रहाचा अभ्यास करण्याचे. म्हणूनच कदाचित lunatic हा शब्द आला असावा ! वेड, संशोधनाचे वेड ! 
अंतरंगात ससा लपवून ठेवणारा चंद्र वास्तवात कसा आहे हे प्रथम नासाने शोधले. भारत ही प्रयत्नशील होताच. येथील पृथ्वी वरील समस्या अधुकर असल्याने चंद्र ग्रहाचा विचार करायला थोडा विलंब झाला, तरी चंद्रावर यशस्वी रित्या विक्रम यान सोडणारे आपण जगाच्या पाठीवर चौथे आहोत, हे ही नसे थोडके.
ISRO ने यशस्वी केलेल्या चंद्र यान  उड्डाण नंतर, चंद्र  जो कवी  कल्पनेत मधुर, शांत, प्रेमळ, अशिक होता तो प्रत्यक्ष किती रुक्ष आहे हे दाखवून दिले. आता जो आपल्याला दिसला आहे तो आहे खरा खडबडीत, पण काय सांगावे, जसजसे आपण त्याच्या अंतरंगात जाऊ तसतसे त्यांचे सौंदर्य ही आपल्याला जाणवेल. तसा तो छुपाच आहे ना ! आपली प्रतिमा तो नक्कीच राखेल. त्याच्यावर पाणी आहे म्हणे, तर अजूनही विश्व असू शकेल. हे मात्र नक्की की या ISRO च्या चांद बरोबर आपली मैत्री अधिक दृढ होईल, वेगळ्या स्वरूपात. चंद्र केवळ दिखावा नसून त्याच्याकडे जगाला भुलविण्याचे काय सामर्थ्य आहे हे तो दाखवलेच.
अर्थात हे वास्तव पाहायला आपल्याला कितीतरी वर्षे लागली, प्रचंड खर्च झाला, कितीतरी मनुष्य बळ लागले. म्हणजे मनातला चंद्र आणि वास्तवातील, हे गणित किती विषम. चंद्राचे प्रतिबिंब किती स्वस्त ! आपण त्यावर समाधान मानून का नाही राहिलो ? मनीच्या चंद्राने पळण्यातलता बाळापासून एकट्या पडलेल्या भगिनी पर्यंत सर्वांना आधार दिला आहे आणि मला खात्री आहे तो आधार तिचा अजूनही भक्कम होणार आहे. बाळा ना अजूनही नवल कथा ऐकायला मिळणार आहेत कारण आपण सर्व नित्य प्रगती पथावर आहोत. ह्या मनीच्या चंद्राने शेवटी आपल्याला आकर्षित करून स्वतः कडे खेचले आहेच. 
संशोधकांना आता अमवस्या, पौर्णिमा, त्यांचे परिणाम हे अधिक योग्य रीतीने आपल्या पर्यंत पोचवता येणार आहेत. भारतीय संशोधकांनी मारलेली ही सर्वात मोठी उडी आहे. अगोदर चंद्र यायचा खाली खेळायला, आकाशात दर्शन देऊन, पाण्यात प्रतिबिंबित होऊन ! आता आपण जाऊ आपली खेळणी घेऊन चंद्राकडे , त्याच्याशी विज्ञान खेळ खेळायला ! 
कल्पना थांबणार नाहीत तरी वास्तव समोर येईलच !!

परंपरा, कोणत्या पाळाव्यात/ कोणत्या टाळाव्या 


 परंपरा पाळाव्यात की नाही हा दिवसेंदिवस, प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या समाजाला, प्रश्न पडतो आहे. ह्याचे प्रमुख कारण परंपरा, मग त्या रूढी असोत किंवा श्रद्धा, म्हणजे अशिक्षित पणा चे लक्षण समजून त्यावर मागासलेपणाचा शिक्का मारला जातो. 

परंपरा म्हणजे त्यात रीतिरिवाज, रूढी, अंधश्रद्धा, सर्व आले. काही रूढी बाबत मला उमगलेला अर्थ असा होता -

रात्रीची नखे किंवा केस न कापणे - पूर्वी कंदीलावर रात्र असताना नखे/केस पायाखाली किंवा स्वयंपाक घरात सहजी सापडू शकत होती, ते टाळणे.

प्रवासाला जाताना हातावर दही ठेवणे - दही म्हणजे खाल्लेले अन्न पचण्यासाठी योग्य. प्रवासात पोटाला आराम मिळण्यासाठी गृहस्वामिनिने घेतलेली खबरदारी.

पाहुणे किंवा घरची मंडळी बाहेर पडल्या पडल्या कचरा न काढणे - माणूस निवर्तल्यावर लगेच जमीन सारवली जाते, तसे इतर वेळी होऊ नये म्हणून. 

अंघोळी नंतर कचरा न काढणे - स्वच्छता दर्शक.
म्हणजेच काय, प्रत्येक रूढीचा शास्त्रीय अर्थ शोधून ती योग्य वाटली तर आचरणे, असे वाटते.

आपले विविध सण, व्रत वैकल्ये, हा सर्व सामाजिक एकतेसाठी चा खटाटोप होता व जाणीवपूर्वक त्याच्या साठी समाज सुधारकांनी प्रयत्न केले होते. आत्ताच्या वेगवान दिनचर्येतून सर्वांना एकत्र आणण्यासाठी सण व उत्सव हे अधिक महत्त्वाचे वाटतात परंतु त्याचे अवडंबर करणे किंवा स्तोम माजवून, गोंगाट करून ते साजरे करणे हे तेवढेच चुकीचे आहे. आपल्या परंपरा अशा हव्यात, जेणेकरून लहान मुलांमधील मधून उद्याचे नागरिक घडतील, आबालवृद्धांना एकत्र करून जीवन मुल्ये जपतील, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा देतील. या पार्श्वभूमीवर कितीतरी ठिकाणी उत्सवा मधून तंटे, पक्ष, वाद उद्भवलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. हे सर्व करण्या मागे ज्येष्ठ नागरिकांचा महत्वाचा सहभाग आवश्यक वाटतो. परंपरा ह्या आत्ताच्या युवा पिढीवर लादल्या न जाता त्या निखळ मूल्ये तोलणाऱ्या व करमणूक करणाऱ्या कशा राहतील हे पाहणे जास्त महत्वाचे.
अजून एक प्रामुख्याने जाणवणारा मुद्दा म्हणजे परंपरांचे जतन करणे ही स्त्री ची जबाबदारी समजली जाते. तसे न होता, स्त्री पुरुष दोघांनीही मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी, परंपरा व रूढी चे योग्य अर्थ सांगून त्यातील जेवढे प्रत्यक्ष शक्य आहेत, योग्य आहेत ते स्वीकारले गेले पाहिजेत. सध्या सर्वत्र व्यवस्थापन शिकवणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. नोकरीसाठी आवश्यक पूर्वतयारी म्हणून त्याकडे पाहिले जातेय. अशावेळी इतिहासाकडे नजर टाकल्यास असे लक्षात येईल की आत्ताचे event mgmt, business mgmt, टीम work, लेडेरशिपे हे सदोदित कानावर पडणारे शब्द पूर्वजांनी किती लीलया पेलले होते. त्या मागे ह्या परंपरा होत्याच. कोणत्याही देशाची परंपरा ही त्याची ओळख होऊ शकते जसे की नमस्कार हा भारतीय, दोन हात जोडून केलेला म्हणजे एकत्र येणे व वाकून केलेला म्हणजे आदर प्रदर्शित करणे. लहान लहान कृतीत केवढा अर्थ दडलेला आहे. सगळ्यांनी पंगत मांडून एकत्र जेवणे यासारखी सुंदर दुसरी रीत नाही. होते एवढेच, हे प्रत्यक्षात उतरायला दोन व्यक्ती एकत्र येणे ही कठीण होऊन बसलेय. अशावेळी जे प्रॅक्टिकल किंवा शक्य आहे तेच स्वीकारले पाहिजे. नाहीतर उपवासाची परंपरा म्हणून उपास करून पित्त वाढवणे, नवर्यासाठी थांबून भूक मारणे, जिवंतपणी भांडून मेल्यानंतर श्रद्धेचे अवडंबर करणे, मंगळागौरी ची जागरणे करून office ला दांड्या, भजने करून आवाज प्रदूषण, दहीहंडी किंवा होळीच्या वेळी घातकी प्रकार घडणे हे सर्व आपण पाहतोच आहोत. 
परंपरा, कोणत्याही व्यक्तीला, समाजाला, देशाला,  हवीच. तिचे पालन योग्य रीतीने, जमेल तेवढे, शिस्तीने, स्वखुशीने, समजून उमजून, मर्यादेमध्ये होणे जरुरी आहे. परंपरेमधून एकमेकांविषयी सद्भावना वाढीला लागून सुंदर समाधानी समाज दर्शन घडणे महत्वाचे. हे जर घडत नसेल तर अशा परंपरा झुगारून सुधारित मूल्ये देणे ही आत्ताची आवश्यक गरज आहे. 

 भटकंती करायला मला नेहमीच आवडले आहे. तरीही सर्व प्रवासात एखादा प्रवास वारंवार लक्षात राहणारा असतो. प्रवास म्हटले की सर्वप्रथम निसर्ग समोर येतो, मनाला धुंध करणारा, ऊर्जा देणारा. एखादे रम्य ठिकाण पाहताना आजूबाजूचे सर्व पाहून घ्यायचे हा माझा नेहमीचा शिरस्ता ! त्यामुळे वेळ, खर्च ह्यांची बचत होतेच आणि वेळोवेळी भरपूर ठिकाणे पाहून होतात, एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा न जाता. 

ह्या माझ्या शिस्तीला एकच अपवाद- कोकण प्रवासाचा. एकदा जाऊन नाहीच समाधान होत. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळी मजा. मग ती वारीच ठरते दर वर्षीची.
उन्हाळ्यात आंबे, करवंदे, जांभळे इत्यादी फळे, पावसात धबधबे , विविध सण, थंडीत डवरलेली शेती, शेकोट्या.. किती पाहू न किती नको.. आता तर कलिंगड, काजू, मशरूम, अशी ही पिके काढू लागले आहेत कोकणातील लहान मोठे उद्योजक. आंब्याची वने तर जागोजागी. जगभर मागणी असलेला कोकणचा आंबा हे सर्व ज्ञात कोकणचे वैभव. अजूनही अशी वैभवे कोकणला लाभली आहेत. ब्रिटिश कालीन वखारी, बाजारपेठा, इतिहास कालीन वाडे, राजवाडे, कवी केशवसुत ह्यांचे जन्मस्थान निसर्गरम्य मालगुंड, सिंधू दुर्ग, विजय दुर्ग, पावस, गणपतीपुळे मंदिर, तेथील समुद्र किनारा, दापोलीचा समुद्र किनारा, अंजेल्याची देवी, अर्यदुर्गा, कुणकेश्वर, पुढे गोव्यातील मंगेशी, शान्ता दुर्गा, महलासा मंदिर ही सर्व कोकणी माणसाची दैवते. अगदी तळ कोकणात नजर टाकली तर मुरुडेश्र्वर, गोकर्ण ही सर्व अतिशय सुंदर पवित्र क्षेत्रे. मन कसे भारावून जाते. येथे आल्यावर या निसर्ग संपदेमुळे आणि येथील माणुसकी दर्शनाने आपण किती श्रीमंत आहोत असे वाटते. राहून राहून असेही वाटते की कोकणी माणसाने आपले धन जतन केले आहे आणि समृद्ध ही. 
सण साजरे करावेत तर ते कोकणातच. चैत्रातील गुढी पाडवा नंतर श्रावण पासून अगदी संक्रांती होळी पर्यंत. हाती पैसा नसला तरी कोकणात श्री गणेशाचे भव्य स्वागत आणि आदरातिथ्य ही अगदी महिनाभर भक्तिभावाने होते. येथील  आरास किंवा सजावट पाहण्यासारखी. धागड धिंगा मुळीच नाही. दिवाळीला फराळ एकमेकांना पोचतोच पोचतो आणि होळी तर पुऱ्या गावाची, खेळीमेळीने. इथल्या प्रसिद्ध खेळांसाठी शिमग्यात चाकर मनी अजूनही वेळात वेळ काढून येतात, पालखी फिरवतात, आशीर्वाद घेऊन परततात! 
इथला माणूस जितका उत्सव प्रिय तेवढाच स्नेहाळ, बोलघेवडा, अतिथी देवो मानणारा. खरेच येथील फणासा सारखा, वरून रांगडा वाटला तरी आतून प्रेमळ. माणूस म्हणजे दोन्ही आले हं! घरातील बेकार आता शिकून सावरून नोकऱ्या करू लागल्या आहेत तरी सर्व कुळाचार, धार्मिकतेला विज्ञानाची जोड देऊन संसार सांभाळणाऱ्या ! मुंबईतील चाकर मनी कुटुंबा समवेत आले की विविध पदार्थ करून जेवणाच्या पंगती करणाऱ्या. आणि सर्व कसे हसतमुख, प्रसन्न मनाने. एवढ्यावरच नाही त्यांचा उत्साह आणि प्रेम थांबत. इतर व्याप सांभाळून, बागांची देखभाल, पापड कुरडया करणे, फणस गरे तळणे, साठे करून वाळवणे, संडग्या मिरच्या, कुळीथ पीठ करून वर आल्या गेलेल्यांच्या हाती भेटी पाठवणे आणि ते ही दुपारची झोप न काढता. किती वर्णन आणि कौतुक करावे तेवढे कमीच. 
केळीचे हिरवे बाग, काजूच्या पिवळ्या नारिंगी वाड्या, नारळीची उंचच उंच झाडे, हिरवीगार भात शेते, मनमोहक अननसे, श्वास धुंद करणारा आंब्याचा मोहर, जमिनीपर्यंत लागलेले फणस, पांढरा शुभ्र प्राजक्ताचा सडा, पिवळी धमक सुरंगी, नाजुकशी बकुळी, पांढरा डवरलेला पण निष्पर्ण चाफा, परसदारी विहीर आणि अविरत काम करणारा रहाट हे सर्व कोकणात च पाहायला मिळते. नाही गर्दी, नाही कसले प्रदूषण, हवी हवीशी शांतता आणि तृप्त मने. काय हवे अजून ?? 
असा हा कोकण चा प्रवास प्रत्येकाने जरूर अनुभवावा. एकदा तरी पूर्ण कोकण पाहायला महिनाभर हवा. मी मात्र धावत्या भेटीत चार दिवसांचा तरी कोकण प्रवास करून येते दरवर्षी, उर्वरित वर्ष पूरेल एवढी ऊर्जा घेऊन !! 

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

 

I was about to sleep and dhamm, the loud noise in a sequence spread in the vicinity.OMG, what would have been that ? Immediately i opened the window and could see the big tree fallen in the adjourning building compound. Oh, it was that Gulmohar which was full of yellow flowers in summer. These days it was still dry and I was waiting for it to turn green with the flowers. How selfish we are, we wait for the trees to give us flowers, shades and the beauty around and do we really take care of them??

The gulmohar tree was a shelter for all birds and a pleasant day for me watching them.

Pigeons, crows, parrots and even squirrels.

They used to play there, be on it and around throughout as per their convenience without interferring and quarreling with one another.

Where they will go now? The tree should be replanted.

I Hope so, the authorities do. 

Tragic part of the event was it happened on the eve of Hindu Nav Varsh Gudhi Padwa.

 

 April 2022