गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 साधारण २००७ -०९ चा काळ असावा. . मोठ्या मुलाची दहावी झाल्यामुळे थोडा वेळ मिळत होता सुट्टीच्या दिवशी. FB account उघडलेले, त्यामुळे जुन्या ओळखी शोधून काढणे, संपर्कात राहणे इत्यादी पासून online काहीतरी शिकणे अशा गोष्टी सवार झाल्या होत्या. त्यातूनच मायबोली या मराठी स्थळाशी गाठ पडली. आणि मग नादच लागला, जवळ जवळ दोन तीन वर्षे पूर्ण बुडून गेले होते. रात्री जेवणे झाल्यावर तास भर तरी नवीन computer वर, नवीन खेळण्याशशी खेळतात तसे सर्व चालू होते. तेथेच गझल प्रकार शिकायला मिळाला. त्यात काही सूर मारता नाही आला पण ओळख नक्की झाली आणि पुढे आपसूकच छोट्या थोड्या फार गझल लिहिल्या गेल्या, माझ्यापुरता. 

या सर्व व्यापात असताना blogging मध्ये बक्षीस मिळवणाऱ्या देव काकांचा परिचय, online च, झाला. त्यांचे तांत्रिक knowledge चांगले असल्याने एकदा मला क्षण हे कवितेत लिहिता येत नव्हते, ते fb वर विचारले. लगेच काका तत्पर मदतीला. नंतर एकदा जलतरंग मध्ये छापायला माझ्याकडून त्यांनी एक पावसावर कविता करून घेतली. ते परखड पणे समोरच्याला चूक असली तर दाखवत, त्यामुळे प्रत्येकाचा विकास होत गेला हे निःसंशय ! माझ्याही बाबतीत ते असेच करू लागले. सर्व ऑनलाईन. 
एकदा त्यांना माझी एक कविता आवडली श्वास, आई वरील, वास्तव वादी. ते संवेदनशील असल्याने त्यांनी तिला लगेच चाल लावून, माझे नाव सांगून, आपल्या blog वर लिहिली. छोटीशी घटना, पण मला खूप काही देऊन गेली. माझ्या मुक्त छंद कवितेचे गेय रूपांतर होऊ शकते हा खूप दिलासा मिळाला व त्या दृष्टीने हुरूप ही आला. 
त्यांनी आपल्या fb account ला स्वत:चा फोटो लावला असल्याने मला त्यांना ओळखता येऊ लागले होते. असेच आम्ही ओझरते एका painting प्रदर्शन वेळी, दादर माटुंगा संगीत कार्यक्रम वेळी अचानकपणे ओझरते भेटलेलो ! 
गंमत म्हणजे एवढीच ओळख असून ही मी त्यांना माझ्या काही कविता पाठवू लागले, ज्यांना चाल लावता येईल असे वाटले. त्यांनी ही निकराने न्याय दिला. माझ्या रचना मुक्त छंदात असून कोणतेही वृत्त आदी न सांभाळता केल्या असल्याने त्यांना चाल लावणे कठीण काम होते, पण त्यांनी ते आवडीने केले, स्वतः चा छंद म्हणून. अशा कितीतरी नवोदित कवी, कवयत्री ना त्यांनी पुढे आणले आहे, छंद म्हणून ! अशी व्यक्ती विरळा. त्यांच्याकडे शिकण्याची उर्मी आहे, त्यातून हे घडते आहे.
कितीतरी दिवस मनात होते त्यांना भेटायचे. तसे एकदा घरी आल्यावर मस्त गप्पा झाल्या. कोणत्या ही विषयावर बोलायची तयारी आणि अतिशय सकारात्मक, सर्व शिस्तशीर ! 
खूप आनंद झाला ह्या भेटीचा. त्यांचा हा छंद असाच चालू राहू दे ही सदिच्छा. 🙏

 पुण्यात एवढे काय आहे की जो जातो तो पुण्य नगरीच्या प्रेमात पडतो.

मला वाटते सुंदर मिलाप आहे जुन्या आणि नवीन विचारांचा. मिश्रण आहे एकत्र झालेले दोन पिढ्यांचे. जागा मुबलक, माती ओढाळ, माणसे अजूनच लाघवी. अरे तुरे करतील तसे अगत्याने  गत संस्कृती चा पाढाही वाचतील. शिकवण्याची ह्यांना खूप खुमखुमी. तेथे गेल्याने अगाध ज्ञानाचा सागर समोर पसरतो. काय काय शिकावे ह्यांच्याकडून? 
स्पष्टवक्ते पणा जो मुंबईकरांना कधी जमला नाही 
स्वाभिमान, जो बाळगण्याची भीती नेहमीच राहिली मुंबई  च्या चाकरमनीला.
चिकाटी, जी मुंबईकराला चिकटलीच आहे आपोआप,  पण नको त्याची ! 
वारसा प्रेम , जे मुंबईकर सांगू शकत नाहीत कारण येथे त्यांना त्यांचीच  ओळख नसते.
संस्कृती दर्शन,  जे पूर्वापार पेशवे काळापासून जिवंत आहे आणि जे मुंबईकरांना दाखवता येणे महा कठीण काम, कुणाकुणा ची आणि कोणती संस्कृती दाखवायची ! 

पुण्यातील अजूनपर्यंत चे आकर्षण म्हणजे मोठाली घरे आणि प्राचीन राजवाडे. ते तर इतिहासापासून पाहिले होतेच पण एकेका कुटुंबाचे ही मस्त जुने वाडे पाहिले की मुंबईकराना स्वप्नात असल्यासारखे वाटते.  जागोजागी छोटी छोटी मंदिरे, देवांना न जुमानता त्यांना ठेवलेली  नावे आणि देवपूजा झाल्यावर पोटपूजेची व्यवस्था म्हणून कोपऱ्या  कोपऱ्यावर टपरी चहा आणि खाद्यगृहे. म्हणजे घरी दारी खाणार तुपाशीच पण उपाशी ही नाही राहणार ! 
धन्य ते पुणेकर आणि त्यांची अजब  जीवनशैली. 
तेथील संगीताचा वारसा, बुद्धिवादी आणि जीवनाशी कोणतीही तडजोड न स्वीकारणारे लोक, खळखळ वाहणारी  नदी, भव्य रस्ते आणि त्यातून आपल्याला हवे तसे बाजी मारून पुढे सरसावणारे पुणेकर ! संध्याकाळी बाजी मारून दिवसाशी दोन हात करून पुन्हा सातच्या आत घरी परतणारे पुणेकर. 
हे सर्व मनुष्य निर्मित आणि निसर्ग संपदा, विचारूच नका. डोंगर कड्यानी भरलेला, trekkers गड्यांचा हक्काचा प्रदेश. थंडीत गुलाबी थंडी आणि उन्हाळ्यात बिन घामाचा पण शरीर कडक करणारा उकाडा. अशी दोन टोके, पुणेकरांसारखीच !  

नाहीतर मुंबई ! 

घेतेय सर्वांना सामावून, मिरवत राहिलीय झेंडा आपल्या उदार अंत:करणाचा. आपल्या वितभर  खळगीची भ्रांत करता करता जमेल तेवढे समाज कार्य करीत. पूर येऊ देत, स्फोट होऊ देत, धमक्या काय आणि अपघात किती, तिला काही फरक पडत नाही ! 
समुद्राचा गाज ऐकत  अखंड वाहणारी जीवन सरिता ! 
येथे आलेल्या प्रत्येकाला आपलेसे करणारी पण तेवढेच प्रत्येकाच्या मनात त्याच्या गावा कडील ओढ कायम ठेवणारी. खरी तर दयनीय अवस्था आहे तिची,  पण वाली कोण ? जो तो आपली तुमडी भरण्यात गर्क आणि येथील राजकारण ! विचारूच नका. मोर्चे, बंद, सभा, घोषणा काय काय ऐकावे तिने. तरीही बिचारी सर्व सण साजरे करते, इमाने इतबारे, साग्र संगीत !  हिच्या जीवावर पूरा देश नाचतो तरीही हिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. का तर ही कुणा एकाची माती नाही ! 
मुंबईने लवकरच पुण्यनगरी पासून काही धडे घ्यावेत असे मात्र वाटते ! 
         अलका काटदरे/ ९.८.२३

 उद्या आपला येतच नसतो तरी

सर्व आपण उद्यावर ढकलतो
कोणत्या विश्वासावर ! 
त्याने तर सर्व अधिकार आज ला दिले
आज ते वापरत नाही त्याला कोण काय करणार
आज म्हणतो आत्ता
आत्ता म्हणतो दहा मोजा घाई नको
करायचे काय ! 
आत्ता, आज का उद्या
अजून परवा आहेच की..
त्याची कोणालाच पर्वा नाही ! 
तो बिचारा वाट पहात राहतो
काहीतरी घडेल ह्याची !! 
25.10.23

 विद्येचा दाता तू , अनाथांचा नाथा

मुले तुझी सारी अन् तूच अन्नदाता
करिशी कृपा आम्हावरी तूच भगवंता
ठेविशी सुखात तूच, आहे अशी वदंता
लक्ष ठेव जरा , विसरू नकोस आम्हा
सेवा करती भक्त गण तूच आमचा त्राता
पिढ्यान् पिढ्या ऐकवतो आम्ही तुझ्या कथा
होऊ देत तुझ्या कृपेने सुकर त्यांच्या वाटा 🙏

 देवा तुझे माझ्याकडे लक्ष नाही

आणि  मी मात्र तुझ्या वर विसंबूनी

मला वाटले तू असशील सर्वज्ञ
का वेड पांघरशी  समजून सर्व

तुझी सेवा केली, ठेविली अपेक्षा
चुकले मी, नाही ठेऊ केव्हा आशा

संत नाही रे मी, माणूस आहे
अती नसले तरी लोभ माया आहे

देवा तू आता कानाडोळा कर
बघेन माझे मी, तुझे काम तू कर ! 

१०.९.२३



 ही भूक नसती माणसाला

तर किती बरे झाले असते
भुके परी वणवण त्याची
राब राब राबणे टळले असते
बळी तो कान पिळी खरे जरी
भूक बळी वाढत गेले नसते
शिकण्याची भूक वेगळीच असते
आजन्म समाधानी आयुष्य मिळते
भूक भूक करून काही मिळत नसते
कष्ट करून ती भागवायची असते
भूक खूप काही शिकवून जाते
पण असते तेव्हा जाळवत राहते
भुकेला मर्यादेत ठेवणे जरुरी असते
केव्हाही ती रेषा ओलांडू शकते

अन्नाची भूक सर्वानाच
भक्तीचा भुकेला एकच
प्रेमाचे भुके आपण सर्वच
अन्नाने भूक भागते पोटाची
भक्तीने आत्म्याची
प्रेमाने मनाची 
भुके साठी दाही दिशा 
त्रिवार सत्य असते

खरेच, ही भूक नसती 
तर किती बरे झाले असते !

   अलका काटदरे/ २३.२.२०२१












 फुकट काहीच मिळत नाही

आणि घेऊ ही नये
शिकलो होतो आपण लहानपणी

सत्य कटू असते पण
नेहमी सत्य च बोलावे
पाठ झाले होते लहानपणी

कुणा त्रास देऊ नये
हिंसा तर नाहीच नाही
आचरले होते लहानपणी

प्रेमाने वागावे सर्वांशी
दया क्षमा शांती ने
माणुसकी होती लहानपणी 

शाळेत घरीदारी सर्वत्र
मोठ्यांच्या तोंडी, पुस्तकात 
हेच तर मंत्र होते लहानपणी

मोठे झाल्यावर असे काय झाले
सर्व चित्र पालटले
आपले लहानपण संपले तरी
समोर लहानगे आहेतच ना

कोणती पुस्तके वाचली ह्यांनी
कोणते मंत्र उच्चारले
कोणत्या मोठ्या शाळेत गेले
सर्वजण हे मोठे होऊन मोठेपणी ! 

अलका काटदरे/ ९.८.२३